लातूर जिल्हा परिषदेत परिवर्तन घडविणार
By आनंदनगरी वेब टीम | Mon 09-01-2017 | 06:36:44 pm
फोटो
♦ एकूर्गा येथील जाहीर सभेमध्ये पालकमंत्री संभाजीराव पाटील यांचे आवाहन
लातूर/प्रतिनिधी : गेल्या 35 वर्षांपासून लातूर जिल्हा परिषदेवर कॉंग्रेसला विजयी केले. मात्र या सत्ताधाऱ्यांनी मालक म्हणून सत्तेचा उपभोग घेतला. आता मालकांची जिल्हा परिषद बदलून जनतेच्या सेवकांची करायची आहे. त्यासाठी येणाऱ्या जिल्हा परिषदेत निवडून जाणारा भाजपचा प्रत्येक लोकप्रतिनिधी हा नेता म्हणून नव्हे तर जनतेचा सेवक म्हणून जाणार आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून जनसेवेसाठी जिल्हा परिषदेत भाजप परिवर्तन घडवणार आहे. पक्षाच्या सर्व उमेदवारांना बहुमतांनी विजयी करण्यासाठी साथ द्यावी, असे आवाहन पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी एकुर्गा येथे केले.
भाजपच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचाराचा शुभारंभ तालुक्यातील एकुर्गा येथे शनिवार, 7 रोजी रात्री 8 वाजता पालकमंत्री संभाजी पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे होते. यावेळी खासदार डॉ. सुनील गायकवाड, आमदार सुधाकर भालेराव, भाजपनेते रमेशअप्पा कराड, प्रेदश प्रवक्ते गणेश हाके, माजी आमदार गोविंद केंद्रे, निलंग्याचे नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, दिलीप देशमुख, बाबू खंदाडे, अशोक केंद्रे, शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, महिला जिल्हाध्यक्षा उत्तरा कलबुर्गे, विजय क्षीरसागर, विक्रमशिंदे, गोविंद नरहरे, तात्याराव बेद्रे, हनुमंत नागटिळक, रामचंद्र तिरुके, विजय काळे, त्र्यंबक गुट्टे, भारत चामे, ललिता कांबळे, राजकुमार कलमे यांची उपस्थिती होती.
संभाजी पाटील म्हणाले, मी एकुर्ग्याच्या कार्यक्रमाला येवून प्रचाराचा नारळ वाढवणार होतो. आजही पहिल्यांदा माजी भूमिका एका कार्यकर्त्याची आहे. मी जिल्ह्याचा पालकमंत्री झालो आणि पहिल्यांदा जिल्हा परिषदेचा आढावा घेतला. गेल्या 35 वर्षांपासून जिल्हा परिषदेची एकहाती सत्ता कॉंग्रेसकडे आहे. दरम्यानच्या काळात केंद्र व राज्यात त्यांचेच सरकार अस्तित्वात होते. तरीही जिल्हा परिषदेच्या विकासात राज्यात शेवटून चौथा क्रमांक असल्याचे समोर आल्यानंतर मला धक्काच बसला. गडचिरोली व चंद्रपूरसारख्या जिल्हा परिषदा लातूरपेक्षा विकासात सरस असल्याचे कळाल्यानंतर मला खंत वाटली. तेव्हा ठरवले की, आता लातूर जिल्हा परिषदेत परिवर्तन करुन एक हाती व एकसंघपणे सामान्यांची सत्ता स्थापन करायची आहे. त्यासाठी या निवडणुकीत भाजपच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करावे.
आजही मी नेता म्हणून नव्हे तर जनतेचा सेवक म्हणून कामकरीत आहे. लोकांचे आशीर्वाद पाठीशी असल्यानेच मी या पदापर्यंत पोहोचू शकलो. त्यामुळे मी सामान्य माणसासाठी कधीही उपलब्ध असतो. निलंग्याप्रमाणे लातूरच्या विकासाकडे लक्ष द्यावे, असे रमेशअप्पा कराड भाषणात म्हणाले होते, तो धागा पकडून पाटील म्हणाले, मी छत्रपतींच्या विचारांना मानणाऱ्यांपैकी असून जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीत निलंग्याप्रमाणेच लातूर ग्रामीण मतदारसंघाच्या व जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष देणार आहे. फक्त गरज पडेल तिथे हाक द्यावी, असे ते म्हणाले. गेल्या साठ वर्षांत कॉंग्रेसच्या काळात जेवढी मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही, त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक मदत गेल्या दोन वर्षांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना पीकविमा व विविध अनुदानांच्या माध्यमातून थेट खात्यांमध्ये जमा केली आहे.
कॉंग्रेसच्या काळात शेतकऱ्यांना मदतीच्या नावाखाली आलेली रक्कमपुढाऱ्यांनी बॅंकेत वळती करुन घेऊन व्याजासह वसूल केली. शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात कोणतेही जोडधंदे नाहीत. ठरावीक चार लोकांना मोठे करण्याचे काम कॉंग्रेसने केले आहे, असा आरोप त्यांनी केला. डॉ. सुनील गायकवाड म्हणाले, सरकारने अनेक लोकहिताचे निर्णय घेतले आहेत. कॅशलेस व्यवहाराचा निर्णय घेतल्यामुळे पारदर्शकता येणार असल्याचे ते म्हणाले.
व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California